Saturday, January 14, 2012

त्रिवार अर्जुन!!!

महाभारत! भारतीय माणसाचा जीव की प्राण! यातील अनेक पात्रांना अनेक लोक वेगवेगळ्या कारणांसाठी आदर्श मानत आलेली आहेत. पण त्यातल्या त्यात अर्जुन हा सर्वांना, विशेषतः तरुणांना नेहेमीच हवा हवासा वाटलेला आहे. लाडका असणं ठीक आहे, पण आजच्या तरुणासमोर तो आदर्श ठेवू शकेल? होय, अगदी नक्कीच ठेवू शकेल. सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात IT industry मध्ये काम करणारया तरुणांसमोर तर शब्दशः त्रिवार आदर्श ठेवू शकेल तो. त्याच्या जीवनातील ३ प्रसंगांमुळे.
सध्याच्या काळात सर्वच कार्यालयांमध्ये multi-tasking हा परवलीचा शब्द झालेला आहे. एकाच माणसावर अनेक कर्मचारयांच्या जबाबदारया टाकून पगाराचा पैसा वाचवण्याची कंपन्यांनी लढवलेली ही शक्कल आहे. आणि या युक्तीला भुलून ही तरूण मंडळी एकाच गोष्टीवर असाधारण एकाग्रता राखण्याच्या कौशल्याला कमी लेखू लागली आहेत.एका वेळी हजार गोष्टींच्या मागे लागून शेवटी कुठलीच नीटपणे पार पडत नाही व आपल्याला समाधान मिळत नाही हे ते विसरत चालले आहेत. शिवाय internet, t.v., वगैरे surfing करावयाच्या गोष्टी यात भर घालतातच. एखादी match, एक सीरियल, व एकदोन सिनेमे असं सगळं एकाच वेळी पाहिल्याशिवाय यांना मजाच येत नाही. हे पाहिल्यावर आठवतो तो विद्यार्थीदशेतला अर्जुन. "पोपटाशिवाय,... नव्हे, पोपटाच्या डोळ्याशिवाय,... मला दुसरे काहीच दिसत नाही". असे म्हणून आपल्या गुरुची वाहवा मिळवणारा अर्जुन. पण त्या वेळचे द्रोणाचार्य जर आजच्यासारखे कुठल्यातरी IIM-परशुराम आश्रम मधून MBA झालेले management guru असते, तर ते अर्जुनाला म्हणाले असते,"गधड्या, अरे बाकिचे शिष्य बघ कसे मस्तपैकी मल्टिटास्किंग करत आहेत! पोपट,झाडे, आजूबाजूचे शिष्य,मी,डोंगर, इत्यादी सगळं एकाच वेळी पाहत आहेत ते. असं पाहिजे, सगळीकडे एकाच वेळी लक्ष देता आलं पाहिजे! नुसत्या पोपटाच्या डोळ्याला काय चाटायचं आहे?"
होय तरुणांनो, मला माहित आहे की office मध्ये तुम्हाला या आधुनिक द्रोणाचार्यांचं म्हणणं मान्य करावंच लागेल. पण निदान office बाहेर, जीवनातील तत्व म्हणून तरी याला मान्यता देऊ नका. एखाद्या गोष्टीवर एकाग्र होवून त्यात निष्णात होणं, हा माणसाला महान बनवणारा गुण आहे. त्याचा त्याग करू नका. multitasking केल्यामुळे तुमचा तात्कालिक फ़ायदा होईलही पण जीवनात अत्त्युच्च पातळी गाठण्यासाठी, एकाच गोष्टीवर focus करणं, specialise करणं, हेच जास्तं महत्वाचं आहे, हे अर्जुनाकडून शिका.
IT-industry मध्ये काम करणारयांच्या आता एक गोष्ट चांगलीच अंगवळणी पडली आहे, ती म्हणजे अधून मधून project नसणे. म्हणजे त्यांच्या भाषेत बेंचवर असणे. एवढंच नव्हे तर हल्लीच्या मंदीच्या काळात तर नोकरी जाणे, बराच काळ unemployed असणे, हे सुद्धा बरयाच जणांना अनुभवायला मिळत आहे. हा अनुभव पांडवांना पण आला होता बरं का! कधी म्हणून विचारताय? त्यांचा १४ वर्षांचा वनवास हे एकप्रकारे बेकार असणे किंवा बेंचवर असणेच नव्हते का?१४ वर्षं बेंचवर, कल्पनाही नाही करवत ना?
युधिष्ठीर, नकुल, सहदेवांनी चकाट्या पिटतच घालवला हा काळ. भीमाने अनेक राक्षसांशी द्वंद्वयुद्ध खेळून आपली शक्ती शाबूत ठेवली व युद्धाची सवय ठेवली. पण खरया अर्थी या काळाचा सदुपयोग केला अर्जुनाने. शंकराच्या पाशुपतास्त्रापासून इंद्राच्या अमोघ शक्तीपर्यंत अनेक दिव्यास्त्रे प्राप्त करून घेण्यासाठी, थोडक्यात म्हणजे आजच्या भाषेत value addition साठी करून घेतला. योद्धा म्हणून अजिंक्य, अवध्य होण्यासाठी, best of the best होण्यासाठी केला. हा आदर्श ठेवून आजचा तरूण सुद्धा कठीण काळात निराश न होता नवनवीन technologies, softwares, शिकू शकतो, पुस्तके वाचून आपले द्न्यान वाढवू शकतो. किंवा अगदी नोकरी करताना वेळ न मिळाल्यामुळे राहिलेले काही छंदही पूर्ण करू शकतो. ज्याचा आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडण्यासाठी नक्कीच उपयोग होवू शकतो.
अश्या प्रकारे unemployed असलेला हा professional, मग जी पहिली नोकरी मिळेल ती पत्करतो. कधी ती कमी पगाराची असते, कधी त्यात job satisfaction नसते, कधी त्याच्या इभ्रतीला साजेशी नसते. अश्या वेळी आठवावा तो अद्न्यातवासातील अर्जुन! तुम्ही थोडी कमी दर्जाची नोकरी पत्करलीत तरी ती नोकरी करणारी व्यक्ती म्हणून तुमचं अस्तित्व तुम्हाला बदलावं लागत नाही, व्यक्ती म्हणून तुम्ही तेच असता. भारतीय असणं, मराठी असणं, सुशिक्षित, सुसंस्क्रुत, मध्यमवर्गीय माणूस असणं सोडून द्यावं लागत नाही. पण अर्जुन? त्याला अद्न्यातवासात त्याचा क्षत्रियाचा, योद्ध्याचा मानाचा व्यवसाय त्यागावा लागलाच, पण राजपुत्र असणं, प्रतिष्ठित राजघराणे इत्यादी सगळं विसरून पायात चाळ बांधावे लागले. याहीपुढे जाऊन, अगदी सगळ्यात basic ओळख, "पुरुष असणे" याचाही त्याग करावा लागला. संपूर्ण पुरुष अशी ओळख असलेल्या त्या जीवाचं काय झालं असेल खरच त्या वेळी?
पण तरीही , वर्ष संपता संपता जेव्हा प्रसंग आला, तेव्हा हाती धनुष्य घेवून एकट्याने सर्व कौरवांचा पराभव केला. त्या एका वर्षात त्याच्या मनाचं खच्चीकरण का झालं नाही? कुठून आला हा आत्मविश्वास?
याचं कारण असं आहे की बाहेरून जरी नपुंसकाचं जिणं जगावं लागत असलं तरी आपण खरे कोण आहोत हे तो एक क्षणही विसरला नव्हता. शमी व्रुक्षावर लपवलेल्या शस्त्रांचा विसर त्याला तिळमात्रही पडला नव्हता.
असंच आता काहींच्या बाबतीत होत असेल, आधीच्या नोकरीत तुम्ही team leader असाल, पण आता तुम्हाला programmer ची नोकरी करावी लागत असेल. तरीही शमी व्रुक्षावर जपून ठेवलेल्या leadership qualities, ते द्न्यान, ती विद्वत्ता, ते शिक्षण यांचा क्षणभरही विसर पडू देवू नका. मग जेव्हा जेव्हा interview साठी जाल, तेव्हा team leader च्या आत्मविश्वासानेच जाल. व ते पद परत एकदा मिळवाल.
या तीन प्रसंगांव्यतिरिक्त अर्जुनाच्या संपूर्ण आयुष्यालाच व्यापून उरलेली गोष्ट म्हणजे, त्याची श्रीक्रुष्णावर असलेली अपार श्रद्धा. वरील सर्व प्रसंगातही ती लेशमात्रही कमी झाली नाही. त्याच्यासारखाच अढळ विश्वास परमेश्वरावर ठेवा, यश तुमचेच आहे. गीतेत म्हटलच आहे,
यत्र योगेश्वरः क्रुष्णो यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम.
आपले पूर्वज खरंच सांगत होते, महाभारत कधीच कालबाह्य होणार नाही. यात भर घालून मी म्हणेन, की अर्जुन कधीच म्हातारा होणार नाही!!!

कोंबडी आधी की अंडं?

मानवजातीला आजपर्यंत अनेक सनातन,कूट प्रश्न पडलेले आहेत, ज्यांची उत्तरं अजूनतरी मिळालेली नाहीत. पण त्या सर्व प्रश्नांचे विषयही तसेच तोलामोलाचे, भारी होते! पण अश्या एक नव्हे दोन सनातन प्रश्नांचा विषय झालेलं आहे ते साधसुधं,सरळ,सोप्पं "अंडं"! हे एक महदाश्चर्यच नाही का? ते प्रश्न म्हणजे "कोंबडी आधी की अंडं?" आणि "अंडं veg की non-veg?". हे प्रश्न विचारले जातात तेच अश्या अविर्भावात की त्यांचं उत्तर मिळणं हे विचारणारयालाही अपेक्षित नसतं.
पण एक दिवस मी असं ठरवलं की या प्रश्नांची उत्तरं शोधून काढायचीच. या प्रश्नांची खरी उत्तरं एका अंड्याशिवाय कोण देऊ शकणार? त्यामुळे मी एका अंड्यालाच हे विचारायचं ठरवलं. मग मी एका बरयापैकी बुद्धिवान, (आणि रिकामटेकड्या) दिसणारया अंड्याला गाठलं, आणि त्याच्यापुढे पहिला प्रश्न टाकला."कोंबडी आधी की अंडं?" ते चमकलंच. "एवढे माणसासारखे माणूस असून एवढं माहीत नाही?"
सनातन प्रश्नाचं उत्तर मिळणार असल्यामुळे मी एका फ़डतूस अंड्याने केलेला अपमान गिळला मुकाट्याने.
अंडं ऐटीत बोलू लागलं "आपण जर कालचक्र उलटं फ़िरवत गेलो ना, तर आपण अश्या काळात जावून पोहोचू की जिथे कोंबडी हा प्राणी अस्तित्वात नव्हता. पण हो! त्य काळात अंडी अस्तित्वात होती!....अहो डायनोसोर ची! डायनोसोर अंडी घालत होते माहित आहे ना? अहो जगातील पहिली कोंबडी ही अंड्यातूनच जन्मली की, पण कोंबडीच्या नव्हे, कोंबडीच्या पूर्वजाच्या अंड्यातून. हां, आता तुम्ही कोंबडीचं अंडं अधी की कोंबडी आधी असं specifically विचारलंत, तर कोंबडी आधी, पण नुसतंच अंडं म्हणालात तर ते कोंबडीच्या आधीच जन्मले हो!"
मी अवाक. बुद्धीवान माणसाला ज्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही ते एका क्षुल्लक अंड्याने किती झटकन दिलं! मी उत्साहाने दुसरा प्रश्न विचारला "अंडे veg असते की non-veg?" यावर मात्र थोडा विचार करून ते अंडं म्हणालं की "ह प्रश्न जरा तात्विक वगैरे आहे, माझ्या ओळखीचं एक अंडं तत्व्द्न्यानाचं प्राध्यापक आहे, आपण त्यांनाच विचारू."
माझ्या मित्र अंड्याच्या ओळखीमुळे आम्हाला कशीबशी प्राध्यापक साहेबांची appointment मिळाली. माझा प्रश्न ऐकून, माझ्याकडे एक तुच्छतेचा कटाक्ष टाकून प्राध्यापक महोदय बोलते झाले "या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी veg व non-veg या शब्दांची व्याख्या करायला हवी. शास्त्रीय द्रुष्ट्या, वनस्पतीपासून मिळालेले ते veg व प्राण्यांपासून मिळालेले ते non-veg अशी सोपी व्याख्या आहे. या व्याख्येप्रमाणे कोंबडीपासून मिळालेले अंडे हे non-vegच आहे. पण यात गोची अशी आहे, की दूध सुद्धा गायीपासूनच मिळते की महाराजा! मग दूध पण non-veg झाले की! उद्या एखादे कर्मठ सोवळे रावसाहेब तुम्हाला सांगू लागले की अंडे हे non-veg आहे, तर खुशाल हो म्हणा त्यांना, पण त्यांना सांगा की तुमच्या व्याख्येप्रमाणे सात्विक दूधही non-veg आहे, आणि मग त्यांचा चेहेरा पहा.
पण आपल्या भारत देशात veg व non-veg ची अजून एक व्याख्या केली जाते. ह्त्त्या करून मिळवलेले ते non-veg व हत्त्या न करता मिळालेले ते veg. या व्याख्येप्रमाणे आजकालची जीव नसलेली broiler अंडी तरी veg. ठरतील. पण साधारणपणे veg. समजली जाणारी अन्न, धान्य, भाज्या, थोडक्यात म्हणजे शेती करून मिळवलेली सर्व अन्न, non-veg ठरतील, कारण शेती मध्ये वनस्पती उपटून किंवा कापून, म्हणजे वनस्पती ची ह्त्त्या करून अन्न मिळवले जाते. मग veg. उरलं तरी काय? तर अंडं, दूध, आणि फ़ळे! म्हणजे मागील व्याख्येत non-veg ठरलेल्या २ पदार्थांनी या व्याख्येत veg. म्हणून हजेरी लावलेली आहे. आता अश्या परिस्थितीत आपण काय करू शकतो सांगा पाहू तुम्हीच..........."
".............ताव मारण्या व्यतिरिक्त काहीही नाही!" प्राध्यापक महाशयांचे प्रवचन ऐकून पोटात कावळे कोकलू लागले होते, त्यामुळे मी उद्गारलो. मग प्राध्यापकांच्या लक्षात आलं की एका भुकेलेल्या मनुष्यप्राण्यासमोर बसलेले आपण एक अंडे आहोत. स्वतःच्या धोक्याच्या परिस्थितीची जाणीव झाल्यामुळे त्यांना घाम फ़ुटला आणि त्यांनी मला जवळ जवळ हाकलून देत मुलाखत आटोपती घेतली.
दोन सनातन प्रश्नांची उत्तरे मिळाल्यामुळे मी नोबेल प्राईज वगैरे ची स्वप्ने पहात चाललो होतो, इतक्यात मला असं वाटलं की मागून कुणीतरी धापा टाकत येत आहे व मला हाक मारत आहे. मी पाहिले तर ते रिकामटेकडे अंडे व प्राध्यापक अंडे माझ्या मगून धावत आले होते, मी थांबल्यावर तेही थांबले व थोडा दम खावून मग बोलू लागले ," तुमचे सनातन प्रश्न काय झटक्यात सोडवले आम्ही, नाही का? पण एक मिनिट थांबा,......या प्रश्नांनी जगाच्या सुरुवातीपासून अक्षरशः असंख्य गप्पा, संवाद...वाद, यामध्ये मनोरंजनाचा मसाला पेरलेला आहे. तेव्हा आमची अशी विनंती आहे की दोन घटका करमणुकीसाठी वाद घालायला लोकांसाठी हे प्रश्न असेच अनुत्तरित सोडून देवूया....तेव्हा आम्ही दिलेली उत्तरे तुम्हे गुप्त ठेवलीत तर बरे होईल, कसे?"
अंड्यांमध्ये झालेल्या या माणुसकी च्या दर्शनाने मला गहिवर-बिहिवर आला हो अगदी. पण निःस्वार्थीपणा करायला मी काय अंडं आहे का? मी तद्दन माणूस असल्यामुळे मला प्रसिद्धीची हाव आहे, त्यामुळे मला काही हा लेख लिहिण्याचा मोह आवरता आला नाही. तेव्हा या सनातन प्रश्नांची उत्तरे एकदम गुप्त ठेवण्याची जबाबदारी मी वाचकहो, तुमच्यावर टाकत आहे. धन्यवाद!!!

उपोद्‍घात व उपसंहार

काही शब्द आपल्याला त्यांच्या अर्थामुळे तर काही त्यांच्या नादामुळे आवडतात. नादमाधुर्यामुळे मला आवडणारे हे दोन शब्द, उपोदघात व उपसंहार.उपोदघात कादंबरीच्या आधी व उपसंहार कादंबरीच्या नंतर येत असल्यामुळे मला मतितार्थ माहित होता, पण नेमका शब्दश: अर्थ माहित नव्हता. पण काही गोष्टी कशा अकस्मातपणे उलगडत जातात!
एक दिवस माझ्या कानावर ’उदघाटन’ हा शब्द पडला आणि विचारांची एक मालिकाच सुरू झाली. ’उदघाटन’ या शब्दाचा मूळ धातू असणार ’उदघात’ म्हणजे नक्कीच ’सुरुवात’ असा असणार. आणि कादंबरीची प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वीचा भाग म्हणून ’उप+उद्‍घात= उपोद्‍घात’ असा उलगडा झाला. ’उपसंहार’ चा अर्थ उलगडणं त्या मानाने सोपं आहे. ’उप+संहार=उपसंहार= शेवटानंतरचा भाग’ किंवा उपशेवट!!! यामुळे एक गंमत अशी झाली की संहार चा शब्दशः अर्थ ठार मारणे असा समजला जातो, तसा नसून शेवट करणे असा आहे अशी ज्ञानात भर पडली.
या शब्दांचे इंग्रजी प्रतिशब्द आहेत क्रमशः prologue व epilogue. त्यामुळे थोडा तर्क लढवून pro,epi,व logue या शब्दांचाही शब्दशः अर्थ समजला. logue म्हणजे नक्कीच लेखन, त्यामुळे log शब्द जोडलेल्या इतर शब्दांकडे गाडी वळली. logarithm=log+arithm= लिखित गणित. catalogue=cata+log=रकान्यात विभागलेले लेखन (categorised लेखन?) इत्यादी...
pro म्हणजे सुरुवात हे ओघाने आलंच.त्यामुळे proactive, promotion,procreate या शब्दांशी खेळत बसलो थोडा वेळ. पण ’लांबवणे’ याला ’prolong' का म्हणत असावेत इथे गाडी अडली आणी epi कडे मोर्चा वळवला.epi म्हणजे शेवट. लगेच आठवलं ते...epidemic! democracy शब्दामुळे demo/demi यांचा ’लोक’ या शब्दाशी संबंध आहे हा अंदाज होताच. म्हणजेच epidemic=epi+demic=लोकांचा शेवट करणारा!!! epidemic चा साथीचा रोग हा अर्थ माहीत होता, पण शब्दशः अर्थ किती भयंकर निघाला! मग epi राहिला बाजूला आणि demi शब्दानेच लक्ष वेधून घेतलं. वेतोबा, म्हसोबा इत्यादी देवांना demi-gods का म्हणतात ते समजलं. लोकदैवत!!! किती छान अर्थ!
शब्दांचे मूलशब्द आणि त्यांचे शब्दशः अर्थ शोधणं हे एक खूप मोठं शास्त्र आहे , आणि मी वर जे काही जावईशोध लावले आहेत त्यातील बरेचसे चुकिचेही असतील. पण वाचकांना शब्दार्थ सांगणे हा माझा हेतू नव्हताच मुळी! मनातल्या मनात मी जी काही कसरत केली, ज्या तार्किक कोलांट्याउड्या मारल्या, त्यातील मजा वाचकांपर्यंत पोचवणे एवढाच हेतू. ती मजा dictionary घेउन अर्थ शोधायला आली नसती.
असं वाटतं की माझ्या मनात ज्या शब्दांचे शब्दशः अर्थ उलगडत नाहियेत त्यांची एक मोठाली माळ होती, जणु काही फ़टाक्यांची माळ. ’उद्‍घाटन’ या शब्दाचे कानावर पडणे म्हणजे जणू काही ती वात पेटवली जाणे. आणि धडाधड फ़टाके फ़ुटत जावेत तसे एकेका शब्दाचे अर्थ उलगडत गेले. या माळेतील काही फ़टाके न फ़ुटलेले राहतात तसे episode,epilleptic,epicentre इत्यादी काही शब्द न उलगडता तसेच राहिले. भूकंपाला epicentre असतं, म्हणजे काय? ’शेवटचा केंद्रबिंदू’?
कुणास ठाऊक, या शब्दांचा अर्थ समजेल तेव्हा फ़टाक्यांच्या एका नव्या माळेचा ’उपोद्‍घात’ होइल कदाचित!!!

लोकल आणि ग्लोबल

सध्याच्या काळात लोकल आणि ग्लोबल हे परवली चे शब्द झालेले आहेत. internet क्रांती आल्यापासून 'think global-act local' हा आजच्या युगाचा मंत्रच बनला आहे.साधारणपणे सामाजिक कामे किंवा क्वचित प्रसंगी व्यावसायिक निर्णय घेताना हे शब्द वापरले जातात. म्हणजे जगाला भेडसावणारया समस्यांवर आपापल्या स्थानिक पातळीवर उपाय शोधावे, किंवा जगातील trends पाहून आपल्या व्यवसायात बदल करावेत इत्यादी. पण परवा विचार करताना मला 'think global-act local' चा एक वेगळाच अर्थ उमगला. जो अगदी प्रत्येक माणसच्या आयुष्याला लागू पडू शकतो. प्रत्येक जण आचरणात आणू शकतो.
यामध्ये लोकल आणि ग्लोबल या दोनही शब्दांचा अर्थ जरा वेगळा आहे. हे दोन्ही शब्द स्थळाच्या संदर्भात न वापरता काळाच्या संदर्भात वापरावे लागतील.
बरीच माणसे आपल्या संपूर्ण आयुष्याचा एकाच वेळी विचार करत नाहीत. म्हणजे होवून गेलेल्या नव्हे, तर होवू घातलेल्या आयुष्याचा. लोक अस म्हणतील की आपण कुठपर्यंत जगणार माहीतच नाही तर विचार करून काय उपयोग? पण खरं सांगायचं तर सध्याच्या काळात, सर्वसाधारणपणे काही अपघात किंवा गंभीर आजार झाला नाही तर माणसे ८० वर्षे तरी अगदी सहज जगतात.काही नकारात्मक माणसे असे विचारतील की त्या आधी मेलो तर काय? पण मेलो तर काय यापेक्षा जगलो तर काय? हा माझ्या मते अधिक भयंकर प्रश्न आहे. कारण जगलो तर नेमकं काय करायचं हे कधीच नं ठरवल्यामुळे, मरणापेक्षाही वाईट आयुष्य , कुढत कुंथत जगणारी अनेक म्हातारी माणसे आज आपल्या अजूबाजू ला दिसतात. म्हणून प्रत्येक माणसाने आपण निदान ८० वर्षे तरी जगणार आहोत असे समजून, चालू क्षणापासून ते ८० वर्षापर्यंत अयुष्य डोळ्यापुढे आणावे. यालाच मी आयुष्याचा global view असं म्हणेन. आणि त्या आयुष्यात आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे, कश्यामुळे आनंद मिळणार आहे ते ठरवावं. यालाच think global, असं म्हणता येईल.
मग आता, act local म्हणजे काय हे सहज समजण्यासारखे आहे. ग्लोबल कडून लोकल कडे हळू हळू येताना, अयुष्यात पूर्ण करण्याच्या इच्छा, प्रथम दशकांमध्ये विभागता येतील. म्हणजे तिशीत अमुक करायचे, चाळिशीत अमुक करायचे इत्यादी...शारिरिक शक्ती लागणारया इच्छा विशी, तिशीत पूर्ण करता येतील तर अनुभव आणि द्न्यान आवश्यक असणारया इच्छा, चाळिशी, पन्नाशी इत्यादी दशकांसाठी राखून ठेवता येतील.
त्यानंतर सध्याच्या चालू वर्षात करावयाच्या गोष्टी ठरवता येतील. असं हळू हळू एका दिवसापर्यंत येता येईल. विचार करा, रोज सकाळी उठल्यावर आजच्या दिवसात आपल्याला अमुक अमुक करायचं आहे, आपल्या अयुष्यातील महत्वाकांक्षेचा अमुक एवढा भाग पूर्ण होणार आहे. हे जर माहित असेल तर सकाळपासूनच किती प्रसन्न वाटेल! दडपण न येता आपण ते काम करू शकू. व मोठ्या प्रवासातील छोटासा टप्पा पूर्ण केल्याचं समाधान मिळेल रोजच्या रोज.
पण एका दिवसाचेही अजून छोटे छोटे भाग करून त्यात कामे बसवण्याचा प्रयत्न करू नका मित्रहो! नाहीतर आपण अक्षरशः Time Table चे गुलाम होऊन बसु आणि जगण्यातील आनंद हिरावून घेतला जाईल. आपल्याला शिखरावर पोचायचं आहेच पण वाटेतलं निसर्ग सौंदर्य पण निरखायचं आहे . हो ना!
मग लागा तर विचार करायला,निर्णय घ्यायला आणि finally कामाला!
THINK GLOBAL - ACT LOCAL!!!!